‘झीन्स’ नावाचे द्विमितीय पदार्थ ताणले असता त्यांच्या आणवीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा संशोधकांनी सैद्धांतिक अभ्यास केला आहे.

गाडी चालवताना फोन वापरताय? थांबा!

January 1,2018 Read time: 4 mins
Photo : Purabi Deshpande / Research Matters

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्याने चालकांच लक्ष विचलित होऊन त्यांची धोकादायक परिस्थिती हाताळण्याची क्षमता कमी होऊ शकते. फोनवर बोलणे आणि फोनचा वापर करून संदेश पाठवणे  या दोन्ही गोष्टी चालकाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम करतात असे ह्या संशोधनाचे निकाल दर्शवतात.

विश्व स्वास्थ्य संस्थेच्या एका अहवालानुसार रस्त्यात घडणारे अपघात हे मृत्यूंच्या नवव्या क्रमांकाचे कारण आहे. भारतात मिनिटाला एक अपघात होतो व दर चार मिनिटाला एक जीव जातो. आधीच्या एका अभ्यासात निदर्शनास  आले आहे की एकंदरीत ३१% चालकांचा अपघात गाडी चालवताना फोन वापरल्याने झाला आहे. गाडी चालवताना फोनच्या वापरामुळे लक्ष विचलित झाल्यामुळे विविध वयोगटातील चालकांच्या प्रतिक्रियाकालावर कश्या प्रकारे परिणाम होतो याचे विश्लेषण करून संशोधकांनी त्याचे परिमाण बनवले आहे.

आयआयटी चे प्राध्यापक नागेंद्र आर. वेलागा व त्यांची सहकारी पुष्पा चौधरी यांनी हे संशोधन केले आहे. प्रा. वेलागा सांगतात, “भारतीय चालकांची आणि इतर विकसित देशातल्या चालकांची गाडी चालवण्याची  पद्धत  वेगळी आहे. भारतात चालक लेनची शिस्त पाळत नाहीत. दोन गांड्यांमधील अंतरही खूप कमी असते. शिवाय फोन वापरण्याच्या सवयीतसुद्धा काही फरक आढळतात. ह्या संशोधनामधे भाग घेतलेल्या चालकांपैकी एकूण ६०% चालक गाडी चालवताना फोन वापरतात. हा आकडा गाडी चालवताना फोनवर बोलण्याच्या प्रवृत्तीत झालेली वाढ दर्शवतो.”

संशोधकांनी तीन वायोगटातील (तरुण गट (वयवर्षे ३०च्या खाली), मध्यमवयीन गट (वयवर्षे ३० ते ५०) आणि प्रौढगट (वयवर्षे ५०च्या पुढे)) शंभर परवानाधारक चालकांचा आभ्यास केला. ह्या चालकांनी 'सिम्युलेटर’चा वापर करून पाच वेगवेगळ्या प्रकारांने गाडी चालवली. पहिल्या प्रकारात फोनचा कुठल्याही प्रकारे वापर केला नाही. दुसऱ्या प्रकारात फोनचा वापर सोप्या संभाषणासाठी केला, जसं की, “मागच्या वेळेस सहलीसाठी कुठे गेला होतात?” तिसऱ्या प्रकारात गणित किंवा तार्किक समस्या सोडवणे यासारखे जरा जटिल संभाषण करत चालकांनी गाडी चालवली. चौथ्या प्रकारात चालक गाडी चालवताना फोन वापरून छोटे संदेश पाठवत होते तर पाचव्या प्रकारात गाडी चालवताना बऱ्यापैकी मोठे संदेश पाठवत होते.

वर नमूद केलेल्या पाचही पद्धतीने प्रत्येक चालकाने एकूण साडे-तीन किलोमीटर गाडी चालवली. प्रत्येक पद्धतीत एका धोकादायक घटनेचा समावेश होता, उदाहरणार्थ, कडेला उभी केलेली गाडी किंवा अचानक रस्ता ओलांडत एखादी व्यक्ती समोर येणं. संशोधकांनी प्रत्येक चालकाची प्रतिक्रिया वेळ मोजली. “प्रतिक्रिया वेळ म्हणजे समोर एखादा धोका दिसल्यापासून ते तो टाळायला चालकाची पहिली प्रतिक्रिया--म्हणजे वेग कमी करणे किंवा ब्रेक दाबणे--येई पर्यंत गेलेला वेळ.” प्राध्यापक वेलागा यांनी स्पष्ट केले.

ह्या संशोधनात असं लक्षात आलं की फोन वापरल्यामुळे चालकांच्या प्रतिक्रिया वेळेत प्रकर्षाने वाढ होते. संशोधकांनी फोन वापरताना नोंदलेल्या प्रतिक्रिया वेळेची तुलना फोनचा कुठल्याही प्रकाराचा वापर न करून गाडी चालवताना आलेल्या प्रतिक्रिया वेळेशी केली. एखादी रस्ता ओलांडणारी व्यक्ती अचानक समोर आल्यावर फोनवर बोलत गाडी चालवणाऱ्या चालकांच्या प्रतिक्रिया वेळेत ४०% वाढ दिसून आली तर फोन वापरून मोठे संदेश पाठवणाऱ्या चालकांना प्रतिक्रिया द्यायला तब्बल तिप्पट वेळ लागला. गाडी चालवताना चालकांना वाटेत मधेच स्थिर उभी असलेली एखादी गाडी दिसली तरी प्रतिक्रिया वेळेत साधारण असेच बदल दिसले. वाटेत स्थिर गाडी दिसल्यावर फोनवर सोप्या पद्धतीने बोलण्याने प्रतिक्रिया वेळेत ४८% वाढ झाली आणि मोठे संदेश पाठवत गाडी चालवण्याने १७१% वाढ झाली. थोडक्यात, फोनचे दोन्ही प्रकारचे वापर (बोलणे आणि संदेश पाठवणे) हे चालकाची कामगिरी खालावण्यासाठी कारणीभूत असल्याचं सिद्ध झालं आहे.

“फोन वापराने वाढलेल्या प्रतिक्रिया वेळेचं कारण आहे की लक्ष विचलित झाल्याने समोरच्या रस्त्याची  छाननी नीट होत नाही आणि म्हणून अचानक ओढवलेली धोकादायक परिस्थिती पटकन लक्षात येत नाही. ह्याच मुळे त्यांच्या प्रतिक्रिया वेळेत प्रचंड प्रमाणात वाढ होते.” प्राध्यापक वेलागा म्हणाले. पण फोन वापरून संदेश पाठवण्यात आणि प्रत्यक्ष फोनवर संभाषण करून आलेल्या प्रतिक्रिया वेळेत एवढा फरक का आढळतो? “फोनवर बोलताना चालक समोर रस्त्याकडे बघत बोलत असतो आणि म्हणून घडणाऱ्या घटनांकडे त्याचं थोडं आधी लक्ष जातं. फोनवरून संदेश पाठवताना असं होत नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.

यापुढे चित्त विचलित करणाऱ्या अजून काही गोष्टींचा--जसे खाणे/पिणे किंवा गाणी ऐकणे--व अजून काही धोकादायाक परिस्थितींचा समावेश अभ्यासात करण्याची संशोधकांची योजना आहे. ह्यातून निष्पन्न झालेल्या निकालाबाबत   सरकारशी तसेच धोरणकर्त्यांशी चर्चा करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

भारतात जरी गाडी चालवताना फोन वापरण्यावर बंदी असली तरी बऱ्याचदा हा नियम पाळला जात नसल्याचं आढळतं. “ह्या संशोधनाचे निकाल लोकांना ही आठवण करून देण्यात उपयुक्त ठरतील की गाडी चालवताना फोनचा वापर हा केवळ चालकांसाठीच नव्हे तर रस्त्यावरच्या इतर लोकांसाठीही धोकादायक ठरू शकतो”, असे गाडी चालवताना मोबाइल वापरल्यास असलेल्या धोक्याचा पुनरुच्चार करताना प्रा. वेलागा म्हणाले.